#मान्सून अलर्ट : पुलावर पाणी आल्याने मुरबाडचा 'हा' मार्ग बंद... पहा व्हिडिओ..!
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड (दि. ०९) : ( किशोर गायकवाड ) मुरबाड (Murbad) व शहापूर (Shahapur Taluka) तालुक्यांना जोडणारा चिखले गावा (Chikhale Village) नजीकचा काळू नदीवरील (Kalu River) पूल सालाबादप्रमाणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील दोन्ही तालुक्यातील गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे.
![]() |
Kalu River Brigade |
दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे चिखले-अंबर्जे (Chikhale - Ambarje) दरम्यानचा काळू नदीवरील पूल पाण्या खाली जात असतो. सदर पुलाची उंची कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय या पुलाला कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण कठडे नाहीत. सबब या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवासी, वाहनचालक यांना बाराही महिने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तर पावसाळ्यात ही परिस्थिती आणखीन भयानक होत असते.
मुरबाड-लेनाड-शहापूर रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू असल्याने सध्या मुरबाड-वासिंद-शहापूरसाठी चिखले मार्ग चांगला पर्याय ठरत आहे. त्यामुळे प्रवासी या मार्गचा अवलंब करीत आहेत. शिवाय मुरबाड तालुक्यातील करवेळे, असोसे, वाघिवली, शिरगाव, झापवाडी, चिखले तसेच मुरबाड शहरातील छोटेमोठे व्यापारी, दुग्धव्यवसायिक, तरकारी विक्रेते तसेच शासकीय-खासगी कर्मचारी, बँक कर्मचारी, चाकरमानी, विद्यार्थी यामार्गे दैनंदिन प्रवास करीत असतात. हजारों नागरिकांची दिनचर्या या मार्गावर अवलंबून आहे.
मुळात आपत्ती प्रशासन (Disaster Management) सक्रिय नसल्याने धोक्याच्या सूचना आपत्कालीन प्रसंगी (Energy Situation) प्राप्त होत असून दरसालाची ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना ही आखली जात नसल्याचे आरोप होत आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असतांना अशा प्रसंगी मुरबाड-शहापूर दरम्यानच्या या पुलाबाबत गांभीर्यपूर्वक विचार होयला पाहिजे होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणा, सुस्त प्रशासन व सीमावाद या सर्वांमुळे नागरिकांच्या पदरी हा जीवघेणा प्रवास आल्याचे उघड आहे. मात्र या पुलाचा कायमचा प्रश्न कधी मार्गी लागेल? या उत्तराच्या प्रतीक्षेत दोन्ही तालुक्यातील जनता दिसत आहे.
"दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. या पुलाची उंची वाढवावी, अशी आमच्या ग्रामस्थांची वर्षानुवर्षाची मागणी आहे. पुलाला संरक्षण कठडे नसल्याने घाबरत घाबरत पूल क्रॉस करावा लागतो. पूर परिस्थितीच्या काळात येथे कोणतेही अधिकारी फेरफटका मारीत नाहीत. पुलावर पाणी असले की तिथे सूचना फलक लावले जात नाही. त्यामुळे रात्रीच्या दरम्यान अंधारात मोठी घटना घडण्याची शक्यता आहे."
-कॉ. सागर किसन भावार्थे, CITU संघटना कार्यकर्ते तथा रहिवासी करवेळे
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
0 Comments