
संघा कडून खरेदी होणार भात

अबब! यंदा भात खरेदीत होणार ९० लाखांचा भ्रष्टाचार
चौकशी कामी शेतकरी मित्राचे मंत्रालयात पत्र..!
[KISHOR K. GAIKWAD]
ठाणे/मुरबाड (दि.२९) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाची (Murbad Taluka Shetkari Sahkari Sangh) भात खरेदी सद्या मुरबाड तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून याबाबत शब्द मशालने सविस्तर वृतांत दोन भागांमध्ये प्रसारित केला आहे. तर संघाच्या भात खरेदीच्या कारभरावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत मुरबाडमधील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष तथा शेतकरी मित्र शंकर वडवले यांनी विविध मुद्द्यां संदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अन्ननागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व मंत्रालयाचे अन्ननागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे. सदर पत्रातील तत्सम मजकूर पुढील प्रमाणे...
'महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१८०/- हमी भावाने भात/धान खरेदी केले जाते. महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन यांच्या आदेशाने व ठाणे जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्या अधिपत्या खाली मुरबाड तालुका भात खरेदी संघाने डिसेंबर महिन्यापासून भात खरेदी करण्यास सुरूवात केलेली आहे. यात ते सर्व संगनमताने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. खरेदी केलेल्या भातावर दिड किलो प्रती क्विटल शासन घट देते. असे असतांना बारदानाच्या वजना पेक्षा एकही किलो जास्त भात घ्यावयाचे नसतांना ते प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रति क्विटल ३ किलो भात घेतात. या वर्षी दिड लाख क्विटल भात खरेदी करण्याचे संघाचे उद्दीष्ट आहे. त्याप्रमाणे खरेदी झाली तर म्हणजेच 1,50,000 x 3 म्हणजेच 4,50,000/- किलो म्हणजेच ४५०० क्विटल भात संघाकडे जास्त येईल. त्याची २१८० प्रति क्विटल प्रमाणे ९८,१०,०००/- (अक्षरी रूपये अठ्ठयानव लाख दहा हजार मात्र) एवढे रक्कमेचे भात संघाकडे जास्त येते. तसेच हमाली व तोलाईसाठी शासन ११/- रूपये प्रति क्विटल देत असल्याचे समजते. तरी सुध्दा ते शेतकऱ्यांकडून साधारणपणे ३०/- प्रति क्विटल हमाली घेत असल्याचे समजते. याची किंमत ४,५०,०००/- (चार लाख पन्नास हजार मात्र) रूपये होतात. म्हणजे या वर्षी साधारणपणे ९० लाखाचा भ्रष्टाचार होईल असे दिसून येते. याबाबत शेतकऱ्यांनी जादा घेतलेल्या भाताची पावती किंवा नोंद मागितल्यास त्याला दिली जात नाही व आम्ही भात खरेदी बंद करू अशा प्रकारची अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते. यामुळे खुले आम भ्रष्टाचार होवून सुध्दा शेतकरी नाईलाजास्तव तक्रार करीत नाही. याचाच फायदा ते अनेक वर्षे घेवून शेतकऱ्यांची लुबाडणुक करीत आहेत. तसेच ठाणे जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना कळविले असता ते यात सामील असल्याने कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई करीत नाही. तसेच या दोन्ही कार्यालयाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाचा आधार घेवून माहिती दिली जात नाही. तसेच गेली २५ वर्ष संघ भात खरेदी करीत असतांना सुध्दा तो पुरेसा ठेवण्यासाठी शेड तयार न केल्यामुळे भात पावसात भिजुन शासनाचे नुकसान होते. तसेच वरील सर्व बाबी पाहता हा भ्रष्टाचार सातत्याने चालु आहे. आपण या बाबत लक्ष घालून सर्व संबंधित यंत्रणांना या बाबत चौकशीचे आदेश दयावेत अन्यथा सदरची बाब आर्थिक गुन्हा अधिवेशन यांच्याकडे चौकशीसाठी सोपवावी. तसे न झाल्यास आम्हांस नाईलाजास्तव याबाबत उपोषणास बसावे लागेल.'
असा इत्यंभूत आशय व मजकूर सदर पत्रात नमूद आहे. मात्र पत्रातील मजकूर चौकशी अंती सत्य ठरल्यास संघावर नेमकी काय कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर त्याआधीच तालुका शेतकरी सहकारी संघ यातून काही वेगळा मार्ग काढतोय का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]
0 Comments