प्रवास वार्ता : ...आणि जीवघेण्या खड्ड्यांतून मुरबाडकरांचा प्रवास सुरू..!
मुरबाड (दि. ३१) : पावसाच्या तडाख्यामुळे कोकणातील अनेक रस्ते होत्याचे नव्हते झाले असतांना प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे मुरबाडकरांच्या वाट्याला देखील दुप्पट-तिप्पट वेळ खर्ची लावणारा जीवघेणा प्रवास आला आहे.
मुरबाड तालुक्यातून बदलापूर, कल्याणकडे दैनंदिन हजारो नागरिक, विद्यार्थी व चाकरमानी ये-जा करीत असतात. मात्र या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा प्रवास महागला असून मोठ्याप्रमाणात वेळेचा अपव्यय होत असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. शिवाय यामार्गे प्रवास करतांना शरीराची हाडे पुरता खिळखिळीत होत असून वाहनांच्या मेंटेनन्सचा भुर्दंड ही खिशाला पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याचे काम सुरू असून सद्यस्थितीत ही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डायवरझन, रस्त्याचे खोदलेले भाग, अपूर्ण बनलेले भाग, जम्पिंग स्पॉट या सर्वांमुळे वाहनांची व त्यामधून प्रवास करणाऱ्यांना नुकसानी व दगदग सोसावी लागत आहे.
मुरबाड तालुका विकासाच्या गर्तेत असल्याच्या वलग्ना करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या आलिशान वाहनांतून प्रवास करतांना सामान्य नागरिकांच्या वेदनांचा अनुभव येणार नाही. एकीकडे महागाईने जगणं नकोस केलं असतांना मुख्य वाहतूकीच्या या खड्डेमय मार्गांनी नागरिकांचे जीवन बेजार केल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरावरून उमटत आहेत. तर या जीवघेण्या खड्ड्यांकडून प्रशासन एखाद्या भीषण अपघाताची वाट पाहणार की यावर वेळेत उपाययोजना आखणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
किशोर गायकवाड
_________________________________________________
[विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबिसीं बांधवांचा मुरबाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल..! ]
ADV












0 Comments