धक्कादायक : योग्य उपचारा अभावी आदिवासी सरपंचाचा बळी?
मुरबाडमधील हृदयद्रावक घटना!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने एका आदिवासी सरपंचचा बळी गेल्याची धक्कादायक घटना तालुक्यात घडली आहे.
सर्वत्र कोरोनाचा कहर वाढला असतांना मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी हजारा पर्यंत पोहोचत आली असून त्यात २२ रुग्ण दगावले होते. मात्र कोरोना झालेल्या या आदिवासी बांधवाला उपचारा बाबत हेलसांड झाल्याने त्यांचा बळी गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीवरून तालुक्यातील साखरे धारगांव येथील ४० वर्षीय आदिवासी सरपंच शिवाजी बबन मुकणे यांना गेल्या सात आठ दिवसांपासून ताप येत होता. मात्र सरळगाव येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन देखील ताप कमी होत नसल्याने त्यांनी शहरातील मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात उपचारासाठी धाव घेतली. सदर दवाखान्यात त्यांना दि. ८ सप्टेंबर रोजी ऍडमिट करण्यात आले असता दुसऱ्या दिवशी त्यांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब पाठविण्यात येऊन दिनांक ११ सप्टेंबर रोजी त्यांंचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हाती आला.
म्हणजेच रिपोर्ट उशीरा मिळाला तो पर्यंत कोविडच्या विष्णूंनी फुफ्फुसात प्रवेश केल्याचा अंदाज आहे. कारण तोपर्यंत मुकणे यांना श्वास घेण्याच्या त्रास वाढू लागला होता. त्यामुळे नातलगांनी त्यांना कळवा येथे नेण्याचा प्रयत्न केला. त्यातच ऍम्ब्युलन्स अपेक्षित वेळी उपलब्ध होण्या ऐवजी रात्री ९ वाजता मिळाली. मात्र मुकणे यांना कल्याण दिशेने नेत असतांना दरम्यान यांची प्राणज्योत मावळली.
उपचार वेळेवर न मिळणे, रिपोर्ट वेळेवर न येणे या जरतरच्या गोष्टी असल्या तरी मल्टीस्पेशालिटी सारखा शीर्षक असणाऱ्या दवाखान्याकडून ही अपेक्षा नसतांना कोरोना सारख्या घातक महामारीच्या रोगावर देखील दिरंगाई झाल्यामुळे एक आदिवासी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा बळी गेला असून एका अभ्यासू सुशिक्षित सरपंचाला मुकावे लागल्याच्या खेदात्मक प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. भविष्यात पुन्हा असे बळी जाऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.
(किशोर गायकवाड)
______________________________________________

0 Comments